#संघ_विसर्जनाची_उद्दिष्टपूर्ती
काल वैंकैया नायुडू देशाचे १३ वे उपराष्ट्रपती झाले आणि दूरचित्रवाणी असो की इतर सामाजिक माध्यमे असोत एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे Lutyens Delhi खऱ्या अर्थाने ७० वर्षांनी काँग्रेस मुक्त झाली, संघ स्थापनेच्या ९२ वर्षांनंतर आज खऱ्या अर्थाने संघाचे स्वयंसेवक देश चालवताहेत, देशाच्या तीनही सर्वोच्च पदांवर संघ स्वयंसेवक विराजमान, प.पू. डॉ हेडगेवारांचं स्वप्न पूर्ण झालं वगैरे वगैरे... पण खऱ्या अर्थाने खरंच डॉ.हेडगेवारांची,पू. गुरुजींची आणि पर्यायाने आपलं संपुर्ण आयुष्य संघासाठी वेचणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची स्वप्न पूर्ती झालीय का...?? उत्तर आहे नाही. संघाचं उद्दिष्ट सत्ता हे कधीच नव्हतं आणि नाही.
तृतीय सरसंघचालक पू.बाळासाहेब आपल्या व्याख्यानांमध्ये म्हणायचे "संघ का उद्देश समाज में कोई RSS नाम का संगठन खडा कर उसकी विरासत को चलाना और उसका पंथ संप्रदाय बनाना नही है, संघ का लक्ष्य है समाज को संगठित करना, हिंदु समाज को जाती पाती विरहित एकत्र करना यह संघ का लक्ष्य है" संघाच्या कुठल्याही सरसंघचालकांची व्याख्यानं काढा त्याचा मुळ गाभा हाच आहे.
पू.श्री गुरुजींना जेंव्हा एका विदेशी पत्रकाराने प्रश्न विचारला होता की संघ कधी विसर्जित करणार, त्यांनी त्याकाळी उत्तर दिलं होतं "जेंव्हा एकुण लोकसंख्येच्या २.५ ते ३ टक्के स्वयंसेवकांची संख्या गाठली जाईल तेंव्हा... पत्रकाराने विचारलं बास इतकंच का, तेंव्हा गुरुजींचं उत्तर होतं हो इतकंच कारण ते २.५, ३ टक्के स्वयंसेवक संपूर्ण समाजाच्या हिताची रक्षा करण्यास आणि भारताला परम वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास सक्षम ठरतील हा माझा विश्वास आहे" आज संघाचे जवळजवळ ५० लाख स्वयंसेवक देशभरात आहेत. आपल्या देशाची एकुण लोकसंख्या आहे १२५ कोटी...!! काढा टक्केवारी...!! गुरुजींचं Vision किती दुरचं होतं हे कळेल आणि आजचा संघ त्यापासुन किती कोसो दुर आहे याची जाणीव होईल.
संघाचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. सत्ता,नारा,नीती,पार्टी ह्या दुय्यम गोष्टी आहेत ते उद्दिष्ट पूर्तीच्या प्रवाहात येणारे Oasis आहेत ज्यांच्या वापर आश्रयासाठी न घेता ऊर्जा संचय घेऊन अधिक जोमाने काम करण्यासाठी करावा. सत्ता ही माणसाला बऱ्याचदा क्रयहीन करते,सुस्त करते. इतिहास साक्षी आहे जेंव्हा जेंव्हा संघावर आघात झालेय तेंव्हा तेंव्हा संघ दुप्पट वेगाने वाढलाय...!! केरळ,आसाम,त्रिपुरा ही उदा त्याला साक्षी आहेत.
जेंव्हा अटलजी संसदेत म्हणतात "सत्ता आयेगी जायेगी, पार्टीयां बनेगी बिगडेगी पर ये देश रहना चाहिए", जेंव्हा मोदी म्हणतात "मै तो एक सामान्य कार्यकर्ता प्रचारक था पता नही कहा से मुझे गुजरात भेज दिया और सरकार की जिम्मेदारी दे दी, अब जब संगठन ने जिम्मेदारी दी है तो निभानी तो पड़ेगी" जेंव्हा वैंकैया म्हणतात की "Yes I'm a RSS swayamsevak and I'm proud of that, because RSS is a great social organization" तेंव्हा त्या त्या विधाना मागची त्यांची भावना ही सारखीच असते. त्याचमुळे जेंव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून/राजकारणातून पायउतार होतील तेंव्हा दुसऱ्याच दिवशी ते संघ स्थानावर दिसले तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण उद्देश्य पूर्तीचा स्थायी भाव...!!
श्री गुरुजींनी सुद्धा हेच म्हटलं होतं की उद्या माझे सगळे सहकारी मला सोडुन राजकारणात गेले (संदर्भ जनसंघाच्या यशानंतर संघाच्या काही वरिष्ठ लोकांनी गुरुजींकडे संघ पुरस्कृत अधिकृत राजकीय शाखा काढण्याची मागणी केली होती) तरी सुद्धा कुणी माझ्याबरोबर असो वा नसो मी उद्या पासुन मोहिते वाड्याच्या संघस्थानावर जाईल आणि पुनःश्च हरी ओम करेन, कारण हेच डॉ हेडगेवारांचं लक्ष्य होतं...
उत्साह मी समजु शकतो पण त्याचं उन्मादात आणि बेफिकरीत रूपांतर होऊ नये. कारण उद्दिष्ट पूर्ती अजुन बाकी है मेरे दोस्त, श्री गुरुजींनी सांगितलेली संघ विसर्जनाची उद्दिष्टपूर्ती.
No comments:
Post a Comment